Posts

Showing posts from April, 2022

दिवस 4 – टेनिंग --प्रत्यक्ष विज्ञान कार्यशाळेला सुरुवात

Image
काल रात्री 2 च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. लाईट पण गेले. पावसामुळे थंडी पण वाढली. टेनिंग हे समुद्र सापाटीपासून साधारण 6000 फुट उंचीवर आहे. म्हणजे कुठल्याही हिमालयीन हिल स्टेशन एवढे. लोकसंख्या नेमकी माहिती नाही पण 3000 वगैरे असेल. गाव बरंच पसरलेलं आहे. आम्ही आहोत ते टेनिंग टाऊन. थोड्या अंतरावर टेनिंग व्हिलेज म्हणून पण आहे. काल रात्री झोपायला उशीर झाला होता आणि प्रवासातला रस्ता कसा होता हे तुम्ही वाचलेच. पण त्यामुळे सकाळी एकदम जाग आली तेव्हा छात्रावासातल्या मुलांचे प्रातः स्मरण सुरू होते. म्हणजे खरंतर आम्हाला उठायला अंमळ उशीरच झालेला..सकाळचे सव्वा पाच वाजलेले. सकाळचे म्हणतोय कारण   लख्ख उजडलेलं होतं. आपल्या इथले पहाटेचे   सव्वा पाच वाजतात...ईशान्य भारतात पहाटे फार लवकर उजाडते आणि रात्री लवकर अंधार पडतो..(अर्थात ही आपण रहातो त्या भागानुसार केलेली तुलना )  मुलांचा दिनक्रम पण नेहमीपेक्षा वेगळा आहे. पहाटे 5 वाजता प्रातः स्मरण , 6 वाजता चहा , 7 पर्यंत अभ्यास , 7 ते 8 स्वच्छता आणि इतर कामे , 8 वाजता जेवण (हो जेवण , न्याहारी नव्हे) , 8:30 ते 1:30 शाळा , दुपारी 2:30 ला न्याहारी , मग 3 ते

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

Image
आजचा दिवस विशेष असणार हे   माहिती होते. दिमापूर ते टेनिंग प्रवास हे आजचे उद्दिष्ट. आधीच्या नियोजनाप्रमाणे सकाळी लवकर निघणाऱ्या नागालँड स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने किंवा सुमोने हा प्रवास करायचा होता. साधारणपणे ईशान्य भारतात मोठ्या प्रवासाला पहाटेच सुरुवात केली जाते. दुपार नंतर प्रवास टाळला जातो. काही ठराविक शहरांमधील प्रवास असेल तर नाइट सुपर बसेस असतात पण त्या अपवाद. पण.. कालच कल्याण आश्रमाचे नागालँड प्रांताचे संघटनमंत्री रघुनंदनजी यांचा फोन आला   आणि ते आमच्या बरोबर येणार आहेत हे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुपारी 2 वाजता निघायचे   आणि JVSN ( जनजाती विकास समिती नागालँड) च्या गाडीनेच जायचे आहे , हेही त्यांनी सांगितले. थोडक्यात काय तर सकाळ मोकळी होती. दिमापूर मार्केट फिरायला जायचे ठरले. अर्थातच उत्सुकता काय बघायची होती हे सांगणे न लगे!! इथे आमच्या गटात चौथा भिडू सामील झाला. औरंगाबादचा मृत्युंजय जाधव , नुकतीच 10 वीची परीक्षा दिलेला आणि एकटा नागालँड बघायला आलेला सोलो ट्रॅव्हलर. अर्थात नागालँडमध्ये असे एकट्याने फिरणे धोक्याचे असते. का ? तो अनुभवच घ्यावा लागतो!! रिक्षा पकडून मार्के

दिवस २ - पुणे-मुंबई -दिमापूर प्रवास

Image
पु णे - मुंबई प्रवास सुरळीत पार पडला. Express way वरती पुरेसे जास्ती ट्रॅफिक असून सुद्धा पहाटे अडीच वाजताच मुंबई विमानतळावर पोचलो.  चेक इन काउंटरवर गेल्यावर कळले की वेब चेक इन करणे अत्यावश्यक आहे. मग परत आमची वरात  माघारी - वरात असे म्हणायला कारण की, आम्ही तिघं आणि आमच्या 9 बॅगा.. नागालँड मध्ये कुठल्या वस्तू मिळतील याची खात्री नसल्याने प्रयोगाला लागणारे सर्व सामान पुण्यातूनच न्यायचे असे ठरले. त्याप्रमाणे प्रयोगाच्या सामानाच्या 3 बॅगा, मग शिवाय तिथे काम करणाऱ्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी घेतलेला खास महाराष्ट्रीय खाऊ (ही खास अजितरावांची सूचना)आणि ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकाशित पुस्तकांपैकी काही प्रती (ही प्रशांतसरांची सूचना)!! त्यामुळे एकूण 9 डाग!! (यामध्ये आमच्या तिघांचे वैयक्तिक कपडे, सामानही होतेच ) वेब चेक इन करून परत काउंटरवर गेल्यावर कळले की माणशी एकच बॅग चेक इन केलेली चालते. आणि आम्हाला 3 जणांमध्ये 6 बॅगा द्यायच्या होत्या. मग काय.. ज्ञान प्रबोधिनी, छोटे सायंटिस्ट प्रकल्प, नाssगाssलँड मधले Science workshop हे सगळे किती महत्त्वाचे आहे हे तिथल्या अधिकारी व्यक्तीला समजावून देण्याशिवाय

दिवस १ - पार्श्वभूमी

Image
" नागालँड मध्ये लोक कुत्रा खातात"..लहानपणी झालेली नागालँडची पहिली ओळख. हळूहळू बाकी गोष्टी वाचनात येत होत्या, लोकांकडून ऐकायला मिळत होत्या. 2014 ते 2016 दरम्यान आसाम, अरुणाचल, मेघालय असा प्रवास घडला पण नागालँड मध्ये जायची संधी मिळाली नव्हती. ज्ञान प्रबोधिनीच्या छोटे सायंटिस्ट प्रकल्पाचा देशभर विस्तार करायची कल्पना पुढे आली आणि मग त्यातच वनवासी कल्याण आश्रमाकडून नागालँड मधल्या शाळेत सत्र घ्यायची मागणी आली. सुरुवातीला नक्की कोण जाणार हे ठरत नव्हते. मग स्वप्नीलचे नाव पुढे आले आणि नंतर कधीतरी माझी वर्णी त्याचा सहकारी म्हणून लागली. ह्याला साधारण महिना झाला असेल. सगळे नियोजन पूर्वा करणार, इथले आयोजन स्वप्नील करणार त्यामुळे मी जाऊन फक्त मुलांबरोबर विज्ञान प्रयोग करत मजा करायची हे फारच आनंददायी होते. मधल्या काळात अन्य प्रकल्प आणि कामे यात व्यग्र असल्याने फारसा विचार झाला नव्हता. पण दोन गोष्टी कळल्या आणि नव्याने उत्साह आला. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला टेनिंग नावाच्या गावातल्या शाळेत मुख्यतः जायचे होते पण ह्या गावाला जायचा रस्ता गुगल दाखवत नव्हते. दुसरे म्हणजे ह्या शाळेचे उदघाटन 1986-87